मुंबई : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) सर्वकाही उपाय-योजना करण्यात येत आहे. मात्र, काही लोक राज्यसरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान, देशात राज्यस्थान हे राज्य लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता महाराष्ट्रात हालचाली सुरु आहेत. अनेकदा सूचना देऊन, विनंती करुनही म्हणावी तशी गर्दी कमी होत (Corona crisis) नसल्याने राज्य सरकार महाराष्ट्र लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) करण्याबाबत गंभीर असून उच्चपातळीवर विचार सुरु आहे.  उद्याच्या (रविवार) जनता कर्फ्यूनंतर (Janata Curfew) राज्य सरकार राज्यातील स्थितीचा सखोल आढावा घेणार आहे. त्यानंतर सोमवारी राज्य सरकारची उच्चस्तरीय बैठक होईल. या बैठकीत राज्य लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन सरकार राज्य लॉकडाऊनचा विचार करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवेवरील कर्मचारी सोडून सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेवरील कर्मचाऱ्यांना त्यांची ओळखपत्रे तपासून स्टेशनवर सोडण्यात येणार आहे. अन्य प्रवाशांना स्टेशनबाहेरच रोखण्यात येईल, असे कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी स्पष्ट केले. पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर या सर्व मार्गांवरील सर्व रेल्वेस्थानकांसाठी हा आदेश असून उद्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत हा मनाईआदेश असणार आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी सामान्यांचा लोकल प्रवास बंद राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 


संपूर्ण राजस्थान लॉकडाऊन 


दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये ३१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आला. तसे आदेशच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिलेत. त्यामुळे, संपूर्ण लॉकडाऊन घोषित करणारे पहिले राज्य ठरले आहे. या लॉकडाऊन दरम्यान, भाज्या, दूध यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींसोबत मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. याशिवाय कोणतेही दुकान सुरु राहणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.