मुंबई : राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भातील अत्यावश्यक सेवेसाठी ४,०६,५९० पासेस  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ३ लाख ८४ हजार ९२० व्यक्तींना क्वारंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. तसेच  ४ कोटी ५३ लाखांचा दंड, वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 २२ मार्च ते १८ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,१०,९२० गुन्ह्यांची नोंद असून २०,९२६ व्यक्तींना अटक करण्यात आली. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ५३ लाख ५९ हजार २०४ रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४३ घटना घडल्या. त्यात ८२२ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले, असेही ते म्हणालेत.


दरम्यान, क्वारंटाईन शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले. एकूण ३,८४,९२० व्यक्ती क्वारंटाइन आहेत. तर पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  या हेल्पलाईनवर ९४,९९८ दूरध्वनी आले, अशी माहिती देशमुख यांनी दिली. तसेच  २२ मार्च ते १८ मे या कालावधीतही काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५९,७०९ वाहने जप्त करण्यात आली.



पोलीस कोरोना कक्ष


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ७ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ८, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१ अशा १२ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. १३६ पोलीस अधिकारी व ११९२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरु आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत, असे ते म्हणालेत.