मुंबई: राज्यभरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईला पाणीपुरवठा करणार तुळशी तलाव पूर्णपणे भरला होता. त्यानंतर रविवारी मोडकसागर धरणही पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागले. मोडकसागरचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. पाऊस असाच सुरु राहिला तर येत्या 48 तासांत तानसा आणि वैतरणा ही दोन्ही धरणंही पूर्णपणे भरतील. तानसा धरण भरून वाहण्याच्या पातळीपासून केवळ १ मीटर अंतरावर आहे. तर वैतरणा भरुन वाहण्याच्या पातळीपासून केवळ दीड मीटर दूर आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे पुण्याची तहान भागवणारे खडकवासला धरणही 85 टक्के भरले आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून १६ जुलैला २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. सकाळी ८ वाजता पाणी सोडण्यास सुरवात होईल. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या चारही धरण क्षेत्रात चांगला पाऊस झालाय.  त्यामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा  ५३. १० टक्के  झाला आहे.



याशिवाय, नाशिकमध्येही चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणात ६५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे नाशिक शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.