मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिस-या लाटेचा धोका कायम आहे. त्यातही डेल्टाप्लसमुळे सर्वांची चिंता वाझढली. तिस-या लाटेसंदर्भात  IIT कानपुरच्या संशोधकांचं एक धक्कादायक संशोधन समोर आलंय. हा अहवाल म्हणजे सर्वांसाठी सावधानतेचा इशारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरतीय. सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालीय. जनजीवन पूर्वपदावर येतंय. पण संकट इथेच टळलेलं नाही. तिस-या लाटेत डेल्टा प्लस व्हेरियंटचा सर्वाधिक धोका मानला जातोय. तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशात डेल्टा व्हेरियंटचा वेग सर्वाधिक असेल. त्यामुळेच या नव्या म्युटेशनला व्हेरियंट ऑफ कंन्सर्न श्रेणीत ठेवण्यात आलंय.


डेल्टा प्लस आधीच्या व्हेरियंटपेक्षा दुप्पट वेगानं पसरतो. हा व्हायरस रूग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज कमी करतो. त्याची लक्षणं सहजासहजी दिसून येत नाही. हा व्हेरियंट लसीकरण आणि उपचारालाही दाद देत नाही.  डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेऊन  IIT कानपूरच्या संशोधकांनीही  तिस-या लाटेसाठी सज्ज राहण्याचा इशारा दिलाय. IITच्या अहवालात तीन प्रमुख टप्प्यावर भर देण्यात आलाय. 


पहिल्या टप्प्यानुसार 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश अनलॉक होईल. पण लोक बेजबाबदारपणे वागत राहिले तर ऑक्टोबरपासून कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते. 


दुस-या टप्प्यानुसार तिस-या लाटेतील कोरोनाच्या म्युटेंटमध्ये बदल झालेला असेल. या स्थितीत ऑगस्टपासूनच रूग्णसंख्येत भर पडण्यास सुरूवात होईल.


तिस-या टप्प्यानुसार लोकांनी कोरोनाचे नियम पाळले आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं तर नोव्हेंबरपर्यंत तिसरी लाट आटोक्यात येईल.


कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं लोक स्वैरपणे फिरताना दिसू लागलेत. अनेकजण सार्वजनिक ठिकाणी मास्क घालत नसल्याचं दिसतायेत. बाजारपेठेतही प्रचंड गर्दी दिसू लागलीय. हे असंच सुरू राहिलं तर तिस-या लाटेचे परिणाम आधीपेक्षा घातक असतील आणि त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.