मुंबई: गणपतीला डीजे-डॉल्बीची गरज नसते. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. वर्षा बंगल्यावरील गणरायाचे विसर्जन केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, उत्सवातील पारंपारिक वाद्यांचा उत्साह हा डीजे-डॉल्बीपेक्षा चांगला असतो. त्यामुळे पारंपारिक वाद्ये वाजवणे योग्य आहे. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीचा अतिरेक झाला आहे. या डीजे-डॉल्बीची गणपतीला नव्हे, तर आपल्यालाच गरज असते. त्यामुळे वयोवृद्ध, लहान मुले आणि रुग्ण, प्राण्यांना त्रास होतो. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला हवा.


डीजे-डॉल्बीमुळे ध्वनीप्रदूषण होते. उत्सव साजरा करताना कोणतीही तडजोड करा, असे मी म्हणत नाही. मात्र, निसर्ग, पारंपरिक पद्धतींचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याकडील उत्सव हे निसर्गाची पुजा करणारे आहेत. ईश्वराची पुजा करणे म्हणजे निसर्ग पूजा असते. आपली शक्तीपीठे ही निसर्गातच वसली आहेत. म्हणूनच निसर्गाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.