नवी मुंबई: गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. ते शनिवारी कोपरखैरणे येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांवर टीकेची झोड उठवली. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, नवी मुंबईतील इमारती, कारखाने, दगडखाणी आणि इतर कंत्राटे कोणाकडे आहेत? खंडणी आणि धमकीच्याबाबतीत नवी मुंबईत गणेश नाईक यांचाच शब्द चालतो. नाईकांची ही सल्तनत नेस्तनाबूत करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी'; अजितदादांचा गणेश नाईकांना इशारा


येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईत जोरदार तयारी सुरु आहे. नवी मुंबईतील नाईकांचे संस्थान खालसा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार जातीने याठिकाणी लक्ष घालत आहेत. 


या पार्श्वभूमीवर शनिवारी कोपरखैरणेत आयोजित करण्यात आलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केला. २०१४ ला पराभव झाला आणि साहेब खुर्चीवरुन पडले. ब्रीच कॅण्डीला उपचार सुरु होते आणि हेच नाईक 'मी काही आता बोलत नाही, पवार साहेबांना सर्व माहिती', असे बोलतात. 'अरे जे बाळासाहेबांचे झाले नाही, ते काय पवारांचे होणार', अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.


नवी मुंबईत महाविकासआघाडीची गणेश नाईकांना धक्का देण्याची तयारी


गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईत नाईक कुटुंबीयांचा दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे मिळाली होती. मात्र, वाऱ्याची दिशा ओळखून गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत नाईक घराण्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.