मुंबई :  दहावी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला खरा, पण या निर्णयाला राज्यात विविध ठिकाणी विरोध होत असून विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलनं केली आहेत. मुंबईत धारावी परिसरात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर नागपुरातू आणि औरंगाबादमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ऑफलाईन परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी नागपूरच्या तुकडोजी चौकात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनाला हिंसळ वळण लागलं. विद्यार्थ्यांनी चौकात उभी असलेली एक बस फोडली. 


या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे?  या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 


विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कोण?
ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात आज ठिकठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.  हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे. सरकार म्हणतंय की घरात रगहा, काळजी घ्या, मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, मग परीक्षा ऑफलाईन का, असा सवाल हिंदुस्थानी भाऊने विचारला आहे. 


हिंदुस्थानी भाऊचं काय म्हणणं
आज हे विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहेत. त्यांच्या भविष्याबरोबर आपल्याला खेळायचं नाहीए, मंत्री सुद्धा ऑनलाईन मिटिंग घेत आहात, कारण तुमच्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या, असं आवाहन हिंदुस्थानी भाऊने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना केलं आहे.  मला तरुण वर्ग फॉलो करत आणि तरुण वर्गासाठी मी लढतो, त्यांच्यासाठी आयुष्यभर लढणार असं हिंदुस्थानी भाऊने म्हटलं आहे.


वर्षा गायकवाड यांचं चर्चेचं आवाहन
विद्यार्थी हे निरागस असतात, ही मुलं अठरा वर्षांच्या खालील आहेत. हे विद्यार्थी एके ठिकाणी कोरोनाशी लढतायत, दुसऱ्या ठिकाणी अभ्यासाशी लढतायत,  भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं आहे. भविष्यात या मुलांना त्रास होऊ नये म्हणून ही परीक्षा घेऊन अकरावी प्रवेश सुरुळीत करता यावा म्हणून हा आमचा उद्देश असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.


संघटनांचं काय म्हणणं आहे त्याविषयी आमच्या चर्चा करावी, आज दहावी आणि बारावीला तीस लाख विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राच्या भौगलिक परिस्थितीचा विचार करावा आणि काय समस्या असतील तर आमच्याशी चर्चा करावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.


कोरोना असताना विद्यार्थ्यांना बाहेर का आणलं असा सवाल वर्षा गायकवाड यांनी विचारल आहे. तर या मुलांना रस्त्यावर आणण्यासाठी तुम्ही मजबूर केलं असं प्रत्युत्तर हिंदुस्थानी भाऊ यांनी दिलं आहे.