मुंबई : पीडित तरूणीच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तरूणीच्या उपचारांचे निर्देश देण्यात आले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख हिंगणघाटला भेट देणार आहेत. गृहमंत्र्यांनी याबाबत तसे ट्विट केले आहे. वर्धा- हिंगणघाट येथे काल घडलेली घटना अतिशय निंदनीय असून संबंधित आरोपीला काल अटक करण्यात आली आहे. आरोपीला कठोरात कठोर शासन होईल यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविले जाईल, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. राज्य शासन वर्धा- हिंगणघाट घटनेतील पिडीत तरुणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तरुणीच्या वैद्यकीय उपचाराबाबत निर्देश देण्यात आले असून उपचाराची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन घेईल. दरम्यान, वर्धामधील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.




हिंगणघाट शहरात नागरिकांचा मोर्चा सुरु झाला असून यामध्ये विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पीडित मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. हिंगणघाटमधल्या तरुणामध्ये या घटनेबाबत संतापाची लाट पसरली आहे. लोकसभेत आवाज उठवताना खासदार नवनीत राणा म्हणाल्यात, वर्धा या जिल्ह्यात महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश दिला आहे. अशा जिल्ह्यात महिलांवर अशी वेळ येत असेल तर खूप दु:खदायक आहे. अशा घटना रोखल्या पाहिजेत. अन्यथा महिला, मुली घराच्याबाहेर पडणार नाही. आपल्या सरकारचा नारा आहे, 'बेटी बचाव, बेटी पढाव'. आज मला अभिमान मुली वाचविल्या जात आहे.


मात्र, मोठ्या झाल्यानंतर त्यांच्यावर असे हल्ले आणि घटना होणार असेल तर ही चिंतेची बाब आहे. यावर कडक कारवाई करण्याची आणि कडक कायदा आणण्याची गरज आहे. अन्यथा आमच्यासारख्या महिलाही यातून सुटणार नाही, अशी गंभीर बाब खासदार राणा यांनी लोकसभा सभागृहात उपस्थित केली.