दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला आहे. यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेली २ हजार ८०८ हेक्टर जमीन सरकारने खाजगी बिल्डरांच्या घशात घातली असून त्यातून २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना जयंत पाटील यांनी हा आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरणाऱ्या जमीनीवर संबंधित जमीन मालकाने गरीबांसाठी घरं बांधणे बंधनकारक आहे. मात्र राज्य सरकारने यूएलसी कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरणारी मुंबईतील २ हजार ८०८ हेक्टर म्हणजेच ७ हजार २० एकर जमीन परस्पर विकण्याचा निर्णय १६ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला. लोकसभा निवडणुकीच्या आाधी सरकारने हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.


दुसऱ्या एका प्रकरणात १९९८ साली पुणे इथल्या एका भूखंडाबाबत अधिकार नसतानाही तत्कालीन राज्यमंत्र्याने एका विकासकाला मोठा फायदा मिळवून दिल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केलाय.त्यावेळी राज्यमंत्री असणारे हे राज्यमंत्री सध्या भाजपाचे आमदार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली.

>