मुंबई: राजस्थानमधील घोडेबाजाराच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ५०० कोटी रुपयांचा निधी गोळा करून दिला, या काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी भाजपवर हा आरोप केला होता. काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रुपये जमवले आहेत, असे सावंत यांनी म्हटले होते. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेत सचिन सावंत यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांचा आरोप अत्यंत बिनबुडाचा आणि तथ्यहीन आरोप आहे. असा आरोप करणाऱ्यांना सांगणं आहे की, आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेला आमदार हा विकला जातो, तुमच्यासाठी तो विकाऊ वस्तू असल्याची टीका दरेकर यांनी काँग्रेसवर केली. तसेच काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळात जी वक्तव्ये होत आहेत ती कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकार तथा  महाविकासआघाडी सरकारला आलेले अपयशापासून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. कधी भाजप सरकार पाडतंय, कधी  राजस्थानला मदत करतोय अशा प्रकारची निराधार वक्तव्य करण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये लागल्याचे शंका येत असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले. 


बिनबुडाचे आरोप करुन सचिन सावंत आपल्या वरिष्ठांना खुश करु शकतात, राजकीय स्पर्धेत काही मिळवण्यासाठी त्यांना या सगळ्याचा उपयोग होईल. तसेच विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सचिन सावंत अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील. परंतु, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये आपली प्रतिमा ही बिनबुडाचे आरोप करणारा प्रवक्ता अशी होईल याचे भान असावे. म्हणूनच सावंत यांच्यासारख्या होतकरु नेत्याने बोलताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.

आज महाविकास आघाडी सरकारमध्ये आपले गृहमंत्री, आपलं सरकार असताना जनतेसमोर वस्तुस्थिती आणावी. अन्यथा भाजपवरप अशाप्रकारचे आरोप करून जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्यामुळे सचिन सावंत यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाहीर माफी मागावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.