मुंबई : राज्य सरकारने राज्यात कोरोना प्रतिबंधन म्हणून नव्या गाइडलाईन्स जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजिनक ठिकाणे बंद राहणार आहेत. आज मध्य रात्रीपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास १ हजार रुपये दंड देखील आकारला जाणार आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.


- मिशन बिगीन अंतर्गत हे आदेश १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू राहतील.


- 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान एकत्र येण्यास मनाई आहे (जमावबंदी ). आज मध्यरात्रीनंतर म्हणजे उद्या रविवारपासून याची अंमलबजावणी होईल.


- या नियमाचा भंग केल्यास प्रती व्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.


- सागरी किनारे व उद्याने, बागा ही सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहतील. भंग केल्यास प्रती व्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल 


- मास्क न घातलेला असल्यास त्या व्यक्तीस ५०० रुपये दंड होईल तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस १००० रुपये दंड होईल.


- मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. मात्र या वेळात टेक होम डिलिव्हरी सुरु राहील. 
याचा कुणी भंग केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविड २०१९ साथ असुस्तोवर बंद करण्यात येईल. सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल. 


- कुठलेही सामाजिक, धार्मिक , राजकीय कार्यक्रम , मेळावे यांना परवानगी नाही. सभागृह किंवा नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही. 


- विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत 


- घरीच विलगीकरण ( होम आयसोलेशन) बाबतीत कोणत्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत ते स्थानिक प्रशासनाला कळवावे लागेल तसेच गृह विलगीकरणात सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची राहील. रुग्णाने विलगीकरण नियमांचा भंग केल्यास संबंधित डॉक्टरवर त्याची माहिती लगेच स्थानिक प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी राहील. त्या डॉक्टरला अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या उपचार व देखरेखीच्या कामातून मुक्त होता येईल.  


- कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल 


संबंधित बातमी: निर्बंधांचे पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


- खासगी आस्थापना ( आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्केपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील तर शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करतील. 


- उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरु ठेवू शकते.


- शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल. बैठका आदि कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा विभाग प्रमुखाने पाहावे.


- सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे. त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे. ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा.


कालच राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. ज्यात आता आणखी भर पडली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या ही चिंतेचं कारण बनली आहे. राज्यातील स्थिती बिकट आहे. शासनाकडून सतत नियम पाळण्याचं आवाहन होत आहे. पण लोकांचं दुर्लक्ष हे कोरोना रुग्ण वाढण्यामागचं कारण ठरत आहे.