मुंबई : महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येऊन १३ दिवस झाले आहेत, पण अजूनही कोणत्याच मंत्र्याच्या खात्यांबद्दल निर्णय झालेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही खात्यांवरून रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटप रखडला होता. पण आज रात्री खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गृह आणि नगरविकास खातं हे शिवसेनेकडे राहणार आहे. तर गृहनिर्माण, सहकार आणि अर्थखातं हे राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृह आणि नगरविकास खात्यांवरून या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार येऊन १३ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. शिवाजी पार्कवर २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा शपथविधी पार पडला. या ६ जणांचे शपथविधी पार पडले असले तरी सध्या हे सगळे जण बिनखात्याचे मंत्री आहेत.


यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विभागवार चर्चा आणि प्रश्नोत्तराचा तास नसेल, असं सांगण्यात आलंय. ठाकरे सरकारनंही सत्तेवर आल्यापासून स्थगिती आणि आढाव्यापलीकडे काही केलं नाही. मंत्री आहेत पण खाती नाहीत, दालनं आहेत पण कामं नाहीत अशी परिस्थिती आहे. खातेवाटपाचा पत्ता नाही पण बंगल्यांचं वाटप मात्र तातडीनं झालं. सरकार काम करायला सुरुवात करणार तरी कधी ? हा नोकरशाहीबरोबरच जनतेचाही प्रश्न आहे.


विरोधकांची टीका


हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही, हे पाहुणं सरकार आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी तीनही पक्ष एकत्र आले आहेत, नवं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आहे, आर्थिक फायद्यासाठी कामांना स्थगिती दिली जात असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला.