Mahim Dargah Construction : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thckeray) यांनी गुढीपाढव्याच्या (Gudi Padwa) सभेत दिलेल्या इशाऱ्यानंतर आता राज्यातील वातावरण तापलं आहे. माहीम (Mahim) येथील समुद्रात उभ्या राहत असलेल्या दर्ग्यावर (Mahim Dargah Construction) महिनाभरात कारवाई झाली नाही तर तेथे भव्य गणपती मंदिर उभारण्याचा इशार राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेने गुरुवारी सकाळी पाडकामास सुरुवात करत अनधिकृत बांधकाम हटवले आहे. यानंतर आता राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर बुधवारी रात्री निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी (मुंबई शहर) ह बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहा अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले होतं. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली. यासाठी सकाळीचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक याठिकाणी पोहोचलं होतं. त्यानंतर ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. स्थानिकांनाही ही कारवाई सुरु असताना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे.


या कारवाईनंतर झी 24 ताससोबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अनधिकृत बांधकाम कारवाई होत राहील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. "माहीम येथील अनधिकृत मजारवरील कारवाई पू्र्ण होईल. राज्यात अनधिकृत अशा काही झाल्या असतील तर कडक कारवाई करत राहणार," असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


काय म्हणाले होते राज ठाकरे?


बुधवारी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवला होता. "महाराष्ट्रात अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. सगळ्यांचं राजकारणाकडे लक्ष. पण दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेली एक गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला दाखवायची आहे. मी मध्यंतरी माहीमला गेलो होतो. तिथे समुद्रात मला लोक दिसले. ते काय करत होते ते समजेना. मग मी एकाला सांगितल्यानंतर त्याने ड्रोनवरून शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. आपण समाज म्हणून अशा गोष्टींकडे पाहात नाहीत. त्याकडे आपलं लक्ष जात नाहीत. तुमच्या भागांमध्येही तुमचं लक्ष असलं पाहिजे की आसपास काय घडतंय. या देशाची घटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचंय की जे मी दाखवतोय, हे तुम्हाला मान्य आहे का?" असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.