मुंबई : मराठा समाजाचा उद्रेक होण्यासाठी आणि इतक्या भव्य प्रमाणात मोर्चा निघण्यास कारण ठरली ती कोपर्डीतील घटना. कोपर्डी हे एक अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. या गावात एका निष्पाप चिमूरडीवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार केला. बलात्कार करून या नराधमांच्या मनातील राक्षस थांबला नाही तर, त्यांनी त्या मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाचीही विटंबना केली. हा प्रकार पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल अशीच ही घटना होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (बुधवार) मराठा मोर्चाचे वादळ मुंबईत धडकत आहे. वास्तविक पाहता बलात्काराच्या त्या घटनेची माहिती पुन्हा देऊन आम्ही कोणाला दुखवू इच्छित नाही. पण, ती घटनाच इतकी अमानूष होती की आज या मोर्चानिमीत्ताने ती पुन्ह आठवली जात आहे. ही संपूर्ण माहिती जर तुम्ही ऐकाल तर सर्द व्हाल. या मोर्चाच्या निमित्ताने कोपर्डी प्रकरणाचा हा घटनाक्रम....


कोपर्डी प्रकरणात बळी गेलीली निष्पाप चिमूकली ही अवघी 15 वर्षांची होती. १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे केवळ अहमदनगरच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशही हादरून गेला.


या प्रकरणातील आरोपी पीडितेशी अत्यंत क्रूर वागले होते. त्यांनी मुलीचे हात-पाय तोडले. ओठांचा चावून चोथा केला होता. केस उपटले होते. तिला प्रचंड वेदना दिल्या होत्या. ते तिच्याशी असे काही वागले होते की, जणू ती काही एखादी निर्जीव वस्तूच आहे. ही घटना पाहिल्यावर लक्षात येते की, पीडितेचे प्राण घेतल्यावरही आरोपी नराधमांच्या डोक्यातील राक्षस शांत झाला नव्हता.


कोपर्डी गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालूक्यातील कुळधरण गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी पीडिता ही आपल्या आजोबांच्या घरून मसाला आणायला सायकलवरून गेली होती. तिच्या आजोबांचे घरही तिच्या घरापासून काही अंतरावरच आहे.


दरम्यान, मसाला घेऊन परत येताना पीडिता नराधमांच्या नजरेस पडली. यावेळी तिन्ही आरोपी दारूच्या नशेत होते. दारूच्या नशेतच त्यांनी तिला अडवले व तिच्याशी घाणेरडे चाळे करण्यास सुरवात केली. नराधमांच्या कृत्याची चाहूल लागताच तिने प्रतिकार करत आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. मात्र, नराधमांनी तिला घट्ट पकडून ठेवले व तिच्या तोंडात बोळा कोंबून ते तिला निर्जन ठिकाणी घेऊन गेले. निर्जन ठिकाणी नेऊन त्यांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. तिची हत्या करून तिच्या शरीराचे अवयवही तोडले.


मृतदेहाची विल्हेवाट लावायची या उद्देशाने हे तिन्ही नराधम पीडितेचे विवस्त्र शरीर घेऊन निघाले होते. दरम्यान, वस्तिवरील एका मुलाने त्या तिन्ही नराधमांना पाहिले. मुलाला पाहताच हे नराधम पळू लागले पण, या मुलाने त्यांचा पाटलाग केला. तिघांपैकी जितेंद्र शिंदे नावाच्या एका नराधमाला या मुलाने ओळखले. त्याने गावात येऊन या प्रकाराची माहिती दिली.


दरम्यान, सध्या कोपर्डी गावात शांतता आहे. आरोपी ज्या दलित वस्तीतील आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे आरोपींची पाठराखण केली नाही. आरोपीचे कुटूंबिय घरदार सोडून निघून गेल्याचे समजते.