मुंबई : राज्यात कोळशाचं मोठं संकट असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी (Nitin Raut) दिली आहे. असं असलं तरी वीज पुरवठा सुरुच ठेवणार असून, राज्याला अंधारात लोटणार नाही असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करतेय. सध्या सर्व वीज प्रकल्प सुरू असून संपाबाबत कामगार नेत्यांशी चर्चेला सरकार तयार आहे. पण संप मागे न घेतल्यास मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा नितीन राऊत यांनी कामगारांना दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला (Power workers on strike) असून यात ३९ संघटना सहभागी झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार खासगीकरणाचं समर्थन करणार नाही, असा विश्वास उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे. 


कालपासून कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यांचे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. बैठक घेणार नाही पण तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तर तुम्ही भेटू शकता, मी संवादाची दारं आजही उघडी ठेवली आहेत आणि ती सदैव उघडी राहतील, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे. 


राज्यात उष्णतेचा उच्चांक वाढल्याने वीजेची मागणीही वाढली आहे. पण कितीही बिकट परिस्थिती आली तरी पुरवठा थांबणार नाही, असा विश्वासही नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्यात विजेची मागणी २८ मेगावॅटपर्यंत वाढली असून दीड हजार मेगा वॅट तुटवडा आहे, युद्धपातळीवर काम सुरु आहे. संप असतानाही जे कर्मचारी कामावर आले त्यांना सलाम असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.