मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आधी काही मनसे नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक राजकीय पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग सुरूच असते. आमच्याकडे अनेक तरुण कार्यकर्ते आहेत. जे सोडून गेले त्यांचा काही तरी इंटरेस्ट असेल. हे काही एका दिवसात होत नाही. मनसेत ही येत्या काळात इन्कमिंग दिसेल. असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कल्याण-डोंबिवली मधील पदाधिकारी दोन दिवसांपूर्वी आमच्या सोबत होते आम्हाला त्यांची नाराजी दिसली नाही. त्यांचा स्वार्थ असेल म्हणून ते गेले. आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही आज डोंबिवली शहर अध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती केली आहे. पण कोणी आमच्या पक्षात हात घालत असेल तर आम्ही ही गप्प बसणार नाही. आगामी निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आणि सत्तेत येण्यासाठीच लढणार,' असं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.


कल्याण डोबिवली मधील मनसे पदाधिकारी शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या नंतर मनसे नेते कृष्णकुंज वर पोहोचले होते. मनसेचे आमदार राजू पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे यावेळी उपस्थित होते.


डोंबिवलीतील मनसेचे माजी विरोधीपक्षनेते, गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता.