Mumbai Rain : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडून दररोज 385 कोटी लीटर (3,850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध  पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा आज दुपारी 1.04 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.


मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजे 22 जुलै 2021 ला मध्यरात्री 03.24 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी म्हणजेच 2020 मध्ये 18 ऑगस्ट रोजी रात्री 9.24 वाजता, 2019 मध्ये 26 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर 2018 आणि 2017 अशी दोन्ही वर्ष हा तलाव  15 जुलै रोजी आणि 2016 मध्ये 1 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. या सर्व आधीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात हा तलाव यापूर्वीच्या नोंदींच्या तुलनेत काही दिवस आधीच पूर्ण भरुन वाहू लागला आहे.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे 6.00 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार 81152.20 कोटी लीटर (8,11,522 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 56.07 टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. 


याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 43.72 टक्के अर्थात 9926.80 कोटी लीटर (99,268 दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 66.79 टक्के अर्थात 9689.40 कोटी लीटर (96,894 दशलक्ष लीटर), हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयमध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या 53.90 टक्के अर्थात 10432.20 कोटी लीटर (1,4,322 दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 51.06 टक्के अर्थात 36611.30 कोटी लीटर (3,66,113 दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 53.18 टक्के अर्थात 1473 कोटी लीटर (14,730 दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या 76.08 टक्के अर्थात 612.10 कोटी लीटर (6,121 दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.