प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड :  मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चेतक इंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक हुकुमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार  सिंह आणि प्रकल्‍प समन्‍वयक अभियंता सुजित कांबळे यांना आरोपी करण्यात आलं आहे. माणगाव पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा त्यांच्याविरोधात दाखल करण्याता आला आहे. याप्रकरणी समन्‍वयक अभियंता सुजित कांबळे यांना पोलीसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांपूर्वीच मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाचा (Mumbai-Goa Highway) पाहणी दौरा केला तेव्‍हां बेजबाबदार ठेकेदारांवर गुन्‍हे दाखल करण्‍याचे आदेश दिले होते. महामार्गाचं काम करताना हलगर्जीपणा केल्‍याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आली आहे. इंदापूर ते वडपाले दरम्‍यान महामार्गाचे काम दर्जाहीन, प्रवाशांच्‍या  सुरक्षेबाबत निष्‍काळजीपणा , वाहनांचे अपघात होवून प्रवाशांच्‍या मृत्‍यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्‍याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  2020 पासून या भागात महामार्गावर 170 मोटार अपघातात, 97 प्रवाशांचा मृत्‍यू तर 208 प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. 


मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर
मुंबई- गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मैदानात उतरले आहेत. महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसंच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपीड क्विक सेटिंग हार्डनर ( एम -60 ) चा वापर करून हे खड्डे बुजवता येथील का याचाही आढावा ते घेत आहेत. याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली आहे याचाही आढावा त्यांनी पाहणी दौऱ्यात घेतला.


महामार्गावरील अपघातास ठेकेदार जबाबदार असून त्यांना जेलमध्ये टाका, बेजबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. दोषींवर 302 चा गुन्हा दाखल करा आणि त्यांना जेलमध्ये टाका, लोकांपर्यंत योग्य तो मेसेज गेला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. 


 या महामार्गाचे काम गेली 14 वर्षे रखडले आहे. त्यामुळे कोकण वासियांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.