स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : आषाढी एकादशीसाठी (Ashadhi Ekadashi) आता अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई, पुण्याहूनही मोठ्या संख्येनं भाविकांनी पंढरपूरची वाट धरली आहे. अशाच काही भाविकांवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलं असतानाच वाटेतच काळानं घाला घातला. मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर पनवेल पासून साडेपाच किलोमीटर अंतर पुढे भाविकांना घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Mumbai Pune Expressway)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात इतक्या गंभीर स्वरुपाचा होता की यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले. ही खाजगी बस आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघाली होती. यामध्ये डोंबिवलीमधील चार गावांमधून चार बस पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाल्या होत्या. त्यापैकीच एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टर ला जोरदार धडक दिली आणि बस 20 फूट खाली कलंडली. 


हेसुद्धा वाचा : 'इचलकरंजी म्हणजे पाक व्याप्त काश्मीर'; भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे वादग्रस्त विधान


 


बसच्या या धडकेमध्ये बसमधील प्रवासी जखमी झाले, तर यामध्ये तीन भाविक जागीच ठार झाले. ट्रॅक्टर मधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बाब घटनास्थळावरून समोर आली. सदर अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 42 भाविक किरकोळ जखमी झाले असल्याची माहितीसुद्धा मिळत आहे. 


मुंबई पुणे एक्स्प्रेसवे अपघातातील मृतांची नावं


1)गुरुनाथ बापू पाटील 
2) रामदास नारायण मुकादम 
3) होसाबाई पाटील 
 तसेच, ट्रॅक्टरमधील दोन पुरुषांचे मृतदेह सापडले असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.