मुंबई: येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी १२० मिमीपेक्षाही जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकणातही सर्वत्र पुढील २४ तास पाऊस सुरुच राहील, असेही कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला



गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. जुलै महिन्यात अपेक्षेइतका पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने ही सारी कसर भरून काढली आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने या तलावांमध्ये ९० टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच तुलसी, विहार, मोडकसागर आणि तानसा ही धरणे भरली असून सर्वात मोठा पाणी साठवण क्षमता असलेले भातसा धरणही ९० टक्के भरला आहे. तर पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्णपणे भरली आहेत. 


यापूर्वी ५ ऑगस्टला मुंबई झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या होत्या. यावेळी ४ तासात ३३३ मिमी पाऊस झाला तर  ७० ते ८० किमी प्रती तास  व जास्तीत जास्त १०६ कि.मी प्रति तास वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबणे आणि झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या होत्या.