मुंबई: मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या ठरावावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करु नका, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला होता. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 
 
 मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी अशाप्रकारचा निर्णय घ्यायला कोण लागून गेले, त्यांना हा अधिकार कोणी दिला, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. मी सुद्धा मराठा समाजातील आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीला आणि पदाधिकाऱ्याला मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा अधिकार आहे, असे राणेंनी सांगितले. यावर आता समन्वय समितीचे पदाधिकारी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 


१ ऑगस्टपासून प्रत्येक मराठा आमदार, खासदार यांच्या घरापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांची मदत तसेच शासकीय नोकरीची मागणी करण्यात आली. पुढील राज्यस्तरीय बैठक परभणी इथे होणार आहे.