मुंबई : मुंबईत शाळेत प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. त्याच बरोबर कालांतराने स्त्रियांच्या गरोदरपणातच मुलांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल अशी चिंताही कोर्टानं व्यक्त केली आहे. दादरमधील राईट टू एज्युकेशन ऍक्ट अंतर्गत प्रवेश करणा-या गरीब विद्यार्थ्यांना बालमोहन विद्यामंदिर या शाळेनं प्रवेश नाकारला आहे. शाळेच्या या भूमिकेचा पालिकेनं कोर्टात विरोध केला आहे.


प्रवेशासाठीची कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करता त्यांना तात्पुरता प्रवेश द्यायला हवं अशीही भूमिकाही पालिकेच्या वतीने कोर्टात मांडण्यात आली.  यावर सुनावणीवेळी बालमोहन शाळेने आपली भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अॅडमिशनच्या नावाखाली काही एनजीओ आणि शिक्षण क्षेत्रातील दलाल शाळेला त्रास देत असल्याचं शाळांनी हायकोर्टात सांगितलं. हायकोर्टानं सोमवारी याचिकाकर्त्या पालकांना आणि शाळा प्रतिनिधींना सदर पालिका शिक्षण अधिका-यांची भेट घेऊन संगनमतानं हे प्रकरण मिटवण्याचे निर्देश दिले आहेत.