मुंबई: आतापर्यंत आपण भाजपच्या भरपूर अडचणी समजून घेतल्या. पण आता शिवसेनेला सत्तेत फिफ्टी-फिफ्टीचा वाटा हवाच, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते गुरुवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. 


निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत भाजपची १२१ जागांवरून १०५ जागांपर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे ५८ च्या आसपास जागा जिंकण्याची शक्यता असणाऱ्या शिवसेनेची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारपरिषेद उद्धव ठाकरे यांच्या देहबोलीत आक्रमकता दिसून आली. यावेळी त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभेला समसमान जागावाटप होणार हे ठरले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी आमची अडचण समजून घ्यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा आपण अडचण समजून घेत जागावाटपात कमीपणा घेतला.  


रोहिणी खडसेंच्या पराभवानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया


पण आता त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असतील तर आम्हाला त्या समजून घेता येणार नाहीत. आता केवळ फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युलाची अंमलबजावणी व्हावी. त्यासाठी संपूर्ण निकाल हातात आल्यानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी एकत्र बसावे. गरज पडल्यास अमित शहा मुंबईत येतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने सत्तास्थापन करण्याची शक्यताही फेटाळून लावली. मला कशाचीही घाई नाही. मी आरामात बसलोय. मात्र, सत्तेसाठी काहीही वेडेवाकडे करणार नाही, असे उद्धव यांनी सांगितले.


तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत शिवसेना आणि भाजप पुन्हा सत्ता स्थापन करेल, असा विश्वास केला. अपक्ष उमेदवारांपैकी तब्बल १५ जण आमच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.