Mumbai Atal Setu News : अभियांत्रिकी आविष्कार म्हणून ज्या अटल सेतूकडे पाहिलं जात आहे, त्याच अटल सेतूमुळं देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुख्य मुंबई शहर आणि नवी मुंबई यांच्यामधील अंतर मोठ्या फरकानं कमी झालं आहे. आता तर, अटल सेतू आणि मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे ला जोडणारा आणखी एक रस्ताही तयार करण्यात येत असून, हा रस्ता तयार झाल्यास मुंबईहून थेट पुणं किमान वेळात गाठणं सहज शक्य होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर मुख्य शहरांना जोडल्या जाणाऱ्या या सर्व प्रकल्पांना आकारास येताना पाहून भविष्यात त्यांचा नागरिकांना आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनं होणारा फायदा अनेकांनीच ओळखला आहे. किंबहुना शहरांच्या सीमा अधिक जवळ आल्यानं ही लहानमोठी शहरंही मोठ्या शहराच्याच नावानं ओळखली जाऊ लागल्यास आश्चर्य वाटू नये. 


गोदरेज उद्योग (Godrej Industries) समुहाचे कार्यकारी संचालक नादिर गोरदेर यांनी याचसंबंधितं वक्तव्य करत आपल्या वक्तव्याला उदाहरणासह सादरही केलं. 'अटल सेतूमुळं मुंबई (Atal Setu Mumbai) या देशातील मूळ महानगराच्या सीमा रुंदावल्या आहेत आणि आता हेच शहर अमेरिकेच्या भाषेत सांगावं तर बोसवॉश प्रमाणं megalopolis अर्थात एका अतिशय मोठ्या शहराच्या रुपात उदयास येईल. हा एक मोठा प्रगत शहराचा भाग असून, तो बोस्टनपासून सुरु होऊन वॉशिंग्टन डीसीपर्यंत जातो. यामध्येच न्यूयॉर्क शहरही येतं. थोडक्यात आता अटल सेतूमुळं पुणेही मुंबईचाच भाग होणार असून, हे अंतर कमी असल्यामुळं अधेमधे येणारी शहरंही त्याअंतर्गत सामावणार आहेत', असं गोदरेज म्हणाले. 


मुंबईसंदर्भात गोदरेज काय म्हणतात पाहिलं? 


एका प्रसिद्ध माध्यमसमुहाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गोदरेज यांना 'मुंबईचं तुमच्या दृष्टीकोनात असणारं महत्वं काय?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय सोप्या शब्दांत त्यांची या शहरासाठीची संकल्पना सांगितली. 


हेसुद्धा वाचा : हीच ती वेळ, मालामाल होण्याची! लोकसभा निवडणुकीआधी सातव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय  


मुळात हे विविध समाजाच्या नागरिकांचं वास्तव्य असणारं शहर असून, ते देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलं आहे. कैक वर्षांपासून या शहरानं जगातील अनेकांसाठीच दारं उघडी ठेलसी आणि त्यामुळंच जागतिक स्तरावरही या शहराची प्रचंड चर्चा झाली असं ते म्हणाले. इथं असणारा शेअर बाजार, रिझर्व्ह बँक आणि इथं होणाऱ्या आर्थिक उलाढाली पाहता हे भारताचं न्यूयॉर्क आहे, तर दिल्ली म्हणजे वॉशिंग्टन डीसी असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. 



दरम्यान, ज्या अटल सेतूचा उल्लेख करत पुणे आणि मुंबई ही शहरं जवळ येणार असल्याचा आशावाद गोदरेज यांनी व्यक्त केला तोच अटल सेतू सध्या मोठ्या वर्गाच्या प्रवासाच्या गरजा भागवताना दिसत असून, लांब पल्ल्याचं अंतर सातत्यानं कमी करताना दिसत आहे. तेव्हा आता खरंच गोदरेज यांनी म्हटल्याप्रमाणं नेमकी कोणती शहरं या मुंबईचा भाग होतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.