मुंबई : रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांना हटवताना खळ्ळ खट्याक करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर  अभिनंदन फेसबूकच्या माध्यमातून केले आहे. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच, असा पुनराउच्चार राज ठाकरे यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंधरा दिवसांत रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले हटवा अन्यथा सोळाव्या दिवशी आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने हटवू, असा इशारा मी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना ५ ऑक्टोबर २०१७ च्या मोर्च्याच्यावेळी दिला होता. रेल्वेने महापालिका हद्दीचे कारण पुढे करून टाळाटाळ करू नये म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना देखील परिस्थितीची कल्पना दिली होती, असे राज यांनी म्हटलेय. 


तरीही १५ दिवसांत फेरीवाले हटवता आले नाहीत किंवा हटवायची  इच्छा नव्हती, म्हणून माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी त्यांना आमच्या पद्धतीने हटवलं,रेल्वे स्थानक परिसर मोकळा करून दाखवला, असे राज म्हणालेत. 



प्रशासनाला प्रवाश्यांचे नाहीत तर फेरीवाल्यांचे हितसंबंध जपायचे आहेत म्हणून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायची सोडून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना अटक केली त्यांना पोलीस कोठडीत डांबून ठेवले आहे. रेल्वे प्रवाश्यांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो, असे राज म्हणालेत.


जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच.  या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते माझे महाराष्ट्र सैनिक आहेत, असे सांगत फेसबुकवर त्यांची नावे पोस्ट करुन खास अभिनंदन केलेय.