मुंबई :  एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांनी ठार मारण्याची धमकी दिली असतानाही त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली नाही. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तसा आदेश दिला होता, असा सनसनाटी आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंनी केलाय. नेमकं काय आहे या आरोपामागचं सत्य? पाहूयात हा रिपोर्ट. (rebel mla suhas kande sensetional blame on former cm uddhav thackeray over to cm eknath shinde saftey)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. ठाकरे सरकारच्या काळात शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती.  इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी आणि सीआयडीनं देखील धमकी आल्याची पुष्टी केली होती. याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. 


मात्र तत्कालिक गृहमंत्री शंभूराज देसाईंना 'वर्षा'वरून फोन आला. शिंदेंना सिक्युरिटी वाढवून देऊ नका, असं ठाकरेंनी सांगितल्याचा सनसनाटी आरोप आमदार सुहास कांदेंनी केलाय. एवढंच नव्हे तर तत्कालिन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याचं सांगून या आरोपांना पुष्टी दिलीय.


दरम्यान, तत्कालिन शहरी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केलाय. कुणाला किती सुरक्षा द्यायची, याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती घेत असते. त्यात मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री हस्तक्षेप करत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.


शिंदे गटानं उद्धव ठाकरेंवर केलेल्या या गंभीर आरोपांमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालीय. शिंदेंच्या जीवाला नक्षलवाद्यांकडून धोका असताना खरंच उद्धव ठाकरेंनी झेड प्लस सुरक्षा देण्यास नकार दिला होता का? याचं उत्तर खुद्द माजी मुख्यमंत्री ठाकरेंनाच द्यावं लागणाराय.