मुंबई : राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरूवात झालीय. उत्तरेकडून दक्षिणेकडे परतीचा पाऊस जात असतो. त्यामुळं जळगाव, गोंदीया या राज्याच्या उत्तरेकडील भागातून पाऊस परतत असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलंय. दरम्यान, समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यानं ६ आणि ७ ऑक्टोबरला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. 


कोकणात जोरदार पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात यंदा सरासरीच्या ८ टक्के पाऊस कमी बरसलाय. मान्सूनचा पाऊस सरासरी १००७ मिमी पडतो. परंतु यंदा तो ९२५ मिमी इतकाच लागला आहे. कोकण आणि मध्य महाराष्टृात सध्या काही ठिकाणी पाऊस पडत असून परतीचा पाऊसही पडण्याची शक्यता आहे. परतीचा पाऊस मराठवाड्यात कमीच पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भागाला पावसाने झोडपून काढले. रत्नागिरीत साखरपा, लांजा, संगमेश्वर या ठिकाणी पाऊस पडला.


मच्छिमारांना सतर्कतेचा  इशारा


अरबी समुद्रात वादळी वाऱ्याची  शक्यता असल्यानं कोकण किनारपट्टीवर मच्छिमारांना सतर्कतेचा  इशारा देण्यात आलाय. समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यानं ६ आणि ७ ऑक्टोबरला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. 


केरळात धोक्याचा इशारा


दरम्यान, केरळातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय. त्यामुळे पर्यटकांनी केरळमध्ये येऊ नये,असे आवाहन केरळचे मुख्यमंत्री यांनी केले आहे.