मुंबई : सारथी संस्थेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सरकार सारथी संस्थेची गळचेपी करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सारथी प्रकरणी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होत. सारथी संस्थेविषयी ठाकरे सरकारच्या मनात आकस असल्याचा आरोप केला होता. या मुद्द्यावरुन सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. मराठा समाजाच्या ५० पेक्षा अधिकांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस ज्या सारथी संस्था बंद केली जाणार अशी अफवा पसरवीत आहेत त्यांच्या काळात संस्थेची काय अवस्था होती हे मराठा समाजाला आठवत असल्याने तो अशा राजकारणाला बळी पडणार नसल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारथी संस्थेच्या उद्घाटनाला झालेल्या खर्चाची देयके ही थकवणाऱ्या भाजपा नेत्यांनी आम्हाला ज्ञान देऊं नये. सारथी संस्था बंद होणार या अफवा पसरवून भाजपा हीन राजकारण करत आहे. सारथी संस्था बंद होणार तर नाहीच पण ती अधिक मजबूत केली जाईल, असं सांगत सचिन सावंत यांनी फडणवीसांना उत्तर दिलं आहे.



दरम्यान, मराठा विद्यार्थी आणि तरुणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सरकार सारथी संस्था बंद करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून होत आहे. तर भाजपने सारथी संस्थेची निर्मिती केल्याने ठाकरे सरकारच्या मनात संस्थेविषयी आकस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. सरकार येतात, सरकार जातात पण संस्था वाढवल्या पाहिजेत, सारथी संस्था किल करण्याचं काम या सरकारकडून झालं असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता.