मुंबई : महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे, अशी टीका काँग्रेस नेत्याने केली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सरकारची कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी अयशस्वी असल्याचं ट्विट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबईमध्ये १,१८१ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. १,१६७ बेडवर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फक्त १ टक्के बेडच शिल्लक आहेत. मुंबईमध्ये ५३० व्हॅन्टिलेटर्स आहेत, यापैकी ४९७ व्हॅन्टिलेटर्सचा वापर सुरू आहे. फक्त ६ टक्के व्हॅन्टिलेटर्स उरले आहेत. ही तयारी मागच्या ८० दिवसात झाली आहे. अजूनही कोरोनाचा उच्चांक यायचा बाकी आहे. म्हणूनच मुंबई हायकोर्टाने कडक आदेश दिले,' असं ट्विट निरुपम यांनी केलं आहे. 



संजय निरुपम यांनी आणखी एक ट्विट करून शिवसेनेवर टीका केली. 'भ्रष्टाचारासाठी कुख्यात असलेल्या बीएमसीने कफनामध्येही दलाली खाल्ली. मृतदेह बांधण्यासाठी खरेदी केलेल्या बॅगमध्येही घोटाळा झाला आहे. ३०० रुपयांच्या बॅग ६ हजार रुपयांना खरेदी करण्यात आल्या आहेत. ३० वर्षांपासून शिवसेनेचं राज्य आहे आणि ते कोरोनाशी लढाई करत असल्याचा दावा करत आहेत', अशी टीका निरुपम यांनी केली. 



'मुंबईमध्ये टेस्टिंग लॅब्स कमी आहेत. त्यामुळे टेस्टिंग कमी होत आहे. टेस्टिंग लॅबवर कामाचा ताण जास्त आहे. रोज ४ हजार रिपोर्ट्स येत आहेत. रिपोर्ट्स यायलाही ४-५ दिवस लागत आहेत. तोपर्यंत रुग्णाची अवस्था आणखी खराब होत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यात आम्ही कमकुवत सिद्ध होत आहोत,' असंही निरुपम म्हणाले. 


महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून १,०४,५६८ एवढा झाला आहे. यातले ५१,३९२ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, तर ४९,३४६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात ३,८३० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे ५६,८३१ रुग्ण आहेत.