मुंबई : उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीला आज बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. बहुमताच्या परिक्षेआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आज बहुमत दिन.. 170+++++ हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' असं संजय राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. याआधी हॉटेल ग्रँड हयातमध्ये आम्ही १६२ असे महाराष्ट्र विकासआघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते, पण आता संजय राऊत यांना १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे.



राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत बंडखोरी करत भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली. मात्र, हे सरकार साडेतीन दिवसच टिकले. गेल्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी अत्यंत घाईघाईने भल्या सकाळी पदाची शपथ घेत सरकार स्थापन केले. बहुमत नसल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाच्या निकालानंतर चित्रच पालटले. आधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे सरकार कोसळले. नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली.


दरम्यान, नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांची निवड झाली होती. तथापि, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, विश्वासदर्शक ठराव आणि नंतरच्या काळातील राजकीय घडामोडी पाहता या पदावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची शुक्रवारी निवड करण्यात आली.


काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडतील. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. सरकारच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.