मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपबरोबर आहे की नाही, हे २३ जुलैला कळेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. आमचं राहुल गांधींवर राजकीय प्रेम नाही, ते एका घटनेपुरतं आहे. आता एनडीए फक्त कागदावरच आहे, अटलजींच्या काळात बहुमत असूनही मित्र पक्षांना विचारलं जात होतं, असं राऊत यांनी म्हटलंय. 


तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) शुक्रवारी संसदेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारविरोधात मांडलेला अविश्वास ठराव असफल ठरला. अविश्वास ठरावाच्या बाजूने १२६ जणांनी मतदान केले तर या ठरावाच्या विरोधात ३२५ जणांनी मतदान केले. त्यामुळे बहुमताच्या जोरावर मोदी सरकारनं विरोधकांचा हा प्रस्ताव हाणून पाडला आहे. मतदानादरम्यान शिवसेना आणि अण्णाद्रमुक यांच्यासह सर्व पक्षांचे मिळून जवळपास ९२ खासदार अनुपस्थित होते.