नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी करत असताना तपासामध्ये ड्रग्जचा ऍँगल समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ड्रग्जच्या या प्रश्नावरुन मुंबई पोलिसांना सल्ला दिला आहे. 'सुशांत सिंह प्रकरणामुळे समोर आलेल्या ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. तरुण पिढीमध्ये अशी व्यसनाधीनता वाढवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे थांबायला हवं.  यात तरुणांचे पालक व मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे,' असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्ज वापराचे व्हॉट्सऍप चॅट समोर आल्यानंतर भाजपने मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. सीबीआयच्या तपासात ड्रग्जचा ऍँगल समोर आला, मग मुंबई पोलिसांनी एवढे दिवस नेमका काय तपास केला? असा सवाल भाजपने उपस्थित केला. 


सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी आधी मुंबई पोलिसांकडे होती, पण हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. यानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात केली. मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. ईडी आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये ड्रग्जचा एँगल समोर आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. 


ड्रग्जचं प्रकरण समोर आल्यामुळे सीबीआय आणि ईडीबरोबरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीचीही या तपासात एन्ट्री झाली. एनसीबीने रिया चक्रवर्तीसह सुशांतच्या जवळच्या व्यक्तींना अटक केली आहे. तसंच एनसीबी बॉलीवूडच्या काही बड्या सेलिब्रिटींनाही समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.