मुंबई : महाराष्ट्रात पराभूत होऊनही शब्दशः जिंकले आहेत ते शरद पवार. ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या पवारांभोवती गेली ४० वर्षे महाराष्ट्राचं राजकारण फिरत राहिलं आणि वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांनी राज्याच्या राजकारणाला कलाटणी दिली. कोण म्हणतं पवारांचं राजकारण संपलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार कर जितने वालें को शरद पवार कहते है!


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात गेले अनेक दिवस सगळ्या नजरा खिळल्या आहेत त्या फक्त आणि फक्त शरद पवारांवर. निवडणुकीआधी फॉर्मात असलेल्या भाजपासमोर ७९ वर्षे वय असलेले पवार अँग्री ओल्ड मॅन म्हणून उभे राहिले. या वयात जिगर दाखवून लढले. आणि निकालाच्या दिवशी काँग्रेस आघाडीसह १०० च्या आसपास मजल मारून मॅन ऑफ द इलेक्शनही ठरले. पण चाणाक्ष राजकारणी असलेल्या पवारांची भूमिका तिथंच संपली नव्हती.


भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत असलं तरी त्यांच्यातील सत्तासंघर्ष पवारांनी हेरला. पवारांशी जवळीक असलेल्या संजय राऊत यांनी भेटीगाठी वाढवल्या. सत्तासंघर्ष चिघळत गेला आणि पुढे पवारांनी काँग्रेस नेते आणि अध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत संवाद साधून नव्या समीकरणांची पायाभरणी केली. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा आतापर्यंत अशक्य वाटणारा प्रयोग प्रत्यक्षात आणला. 


राज्याच्या राजकारणात पवारांबद्दल अनेक आख्यायिका आहेत. राज्यातल्या प्रत्येक घटनेत पवारांचा हात असतो आणि पवार काहीही करू शकतात हे त्यांच्याबद्दल बोललं जातं. त्यात तथ्य असो वा नसो. पण महाराष्ट्राच्या राजकारणातील या नव्या प्रयोगात मात्र पवारांचा हात आहे हे सर्वांनी पाहिलं आहे. किंबहुना तो नसता तर हे समीकरण जुळलंच नसतं.


यशवंतराव चव्हाणांचे शिष्य आणि वारसदार असलेल्या शरद पवारांनी वयाच्या ३८ व्या वर्षी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोद सरकार बनवलं होतं. देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. त्यानंतर चार दशकं महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत राहिलं. ते काँग्रेसमध्ये गेले. पुन्हा वेगळा पक्ष काढला. पुन्हा काँग्रेस बरोबर सत्तेत गेले.


विधानसभा निवडणुकीनंतर २०१४ ला भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि शिवसेनेच्या साथीनं बहुमत मिळवलेल्या भाजपला दूर ठेवून तीन पक्षांचा नवा प्रयोग केला. कोण म्हणतं पवारांचं राजकारण संपलं? उलट असं म्हणणाऱ्यांनाच पवारांनी ब्रेक लावला.


काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राजकारणात टिकून राहिलेले नेते देशभरात फारच कमी आहेत. त्यातले एक शरद पवार. ममता बॅनर्जींसारखं स्वबळावर सत्ता त्यांना मिळवता आली नाही. पण पवारांशिवाय काँग्रेसलाही सत्ता बनवता आली नाही, हे पवारांचं वैशिष्ट्य. आणि आता तर विरोधात बसण्याचा कौल असतानाही पवार सत्ता मिळवण्याची किमया करत आहेत. म्हणूनच तर हार के जितने वालो को शरद पवार कहते है असं म्हणतात.