मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १० लोकसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघांमधील पदाधिकाऱ्यांशीही पवार संवाद साधणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीसाठी सोडलेला नाही. मात्र या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. 


राष्ट्रवादी औरंगाबादेत निवडणुकीची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झालीय.  कोल्हापूर, सातारा, मुंबई, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद अमरावती, रावेर आणि जळगाव या मतदारसंघांमधील पदाधिकाऱ्यांशी पवार संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीने औरंगाबाद मतदार संघावर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे अहमदनगर जागेवर काँग्रेसने दावा सांगितला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये जागेचा वाद कायम असल्याचे दिसून येत आहे.