Urfi Javed vs Chitra Wagh : बिग बॉस फेम उर्फी जावेद आणि भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांचा वाद गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद (Urfi Javed) घालून फिरत असलेल्या कपड्यांवरुन चित्रा वाघ (Chitra Wagh) चांगल्याच संतापल्या आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करत राज्य महिला आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी  जावेद विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police) उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर अंधेरीच्या अंबोली पोलिसांनी उर्फीची चौकशी केली. याआधी चित्रा वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला करु शकतात, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाकडे केली होती. यानंतर महिला आयोगाने पुढील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात चित्रा वाघ यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.


यासर्व वादात राज्यातील राजकारण्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे(Sharmila Thackeray) यांनी आता उर्फी जावेद प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पनवेलमध्ये एका कार्यक्रमासाठी आल्या असताना शर्मिला ठाकरे यांनी याबाबत हटके उत्तर दिलं आहे. उर्फीविषयी प्रश्न विचारताच मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.


अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया


विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं होतं. "महिला महिलांमध्येच वाद सुरु आहे. या प्रकरणात आम्ही कोणी बोलतोय का?  आम्ही तर महिलांना संधी देतोय,त्या संधीच सोन करायचं की राख करायची हे त्यांच्या हातात आहे, असे अजित पवार म्हणाले होते.


दुसरीकडे चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीने ट्वीटरवर त्यांना प्रत्युत्र दिलं होतं. मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा वाघ मेरी सासू, उर्फी के अंडरविअरमें छेद है, चित्राताई ग्रेट है अशा चारोळ्या रचत उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. यावर बोलताना चित्रा वाघ यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली होती. "मला यावर काहीही बोलायचं नाही. तिने कितीही काहीही लिहिलं, शब्दांची मोडतोड केली, मला काहीही बोलली तरी हा नंगानाच आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि यापुढेही राहिल. आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे," असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते.