मुंबई : आमचं ठरलंय ठरलंय म्हणणाऱ्यांनी शेवटपर्यंत काय ठरलंय, ते सांगितलंच नाही.... आणि आता आमचं ठरलंय म्हणणाऱ्यांवर आमचं तुटतंय म्हणण्याची वेळ येतेय की काय, असा प्रश्न आहे. महायुतीत सेना-भाजपमध्येच अविश्वासाचं वातावरण पाहायलं मिळतं आहे. दुसरीकडे महायुतीमधील इतर पक्षही मंत्रिपदाची मागणी करु लागल्याने भाजपचं टेन्शन वाढलं आहे. 


दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकांच्याआधी पत्रकार परिषदेत महायुतीची घोषणा करण्यात आली. पण नेमकं ठरलंय काय याचा सुगावा कुणालाच लागू देण्यात आला नाही. समसमान वाटप हे सूत्र ठरवण्यात आलं असलं, तरी त्यात नेमकं समसमान काय, हे गुलदस्त्यात आहे. 


मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटपाच्या धोरणाबाबतही अनिश्चितता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीही याबाबत संभ्रमात आहेत. शिवसेना-भाजपचे वरिष्ठ नेतेही नेमकं काय ठरलंय, याबाबत संभ्रमात आहेत. नेमका याचाच फायदा घेत, भाजपला कमी यश मिळाल्यानं शिवसेना सातत्यानं मुख्यमंत्रीपदावर दावा करते आहे.


निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये संवाद नसल्याचं स्पष्ट तर झालंच. पण सेना-भाजपमध्येही अविश्वास वाढल्याचं चित्र निर्माण झालं. अमित शाहा यांच्या मुंबई भेटीनंतर दोन्ही पक्षांत हा विश्वास पुन्हा निर्माण होणार का, याची उत्सुकता आहे.