मुंबई : 'विकास गांडो थयो छे!', असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधकांसोबतच स्वकियांनीही टीका करत सरकारला आगोदरच घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेला भाजप शिवसेनेच्या टीकेन अधिकच व्याकूळ होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकाराल धारेवर धरले आहे. दरम्यान,  कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यात राहुल गांधींची टीका समजण्यासारखी आहे. पण, यशवंत सिन्हा हे भाजपचे नेते आहेत. तसेच, ते भाजपचे माजी केंद्रीय मंत्रीही आहेत. त्यामुळे सिन्हांच्या टीकेने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता कोणी उघड बोलून दाखवली नसली तरी, सिन्हांची टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे.


दरम्यान, अचूक टायमिंग साधत उद्धव ठाकरे यांनी 'विकास गांडो थयो छे!' म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. गुजराती भाषेत 'विकास गांडो थयो छे!'चा अर्थ ‘विकास वेडा झाला आहे’, असा होतो. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या विधानांचा आधार घेतल्यामुळे भाजपला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.


पगारी प्रचारकांच्या फौजा सोडून मुद्दे खोडता येणार नाहीत


दरम्यान, 'देशाचे मोठे नुकसान सुरू आहे. यावर मी शांत बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेन. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असा तोफखाना यशवंत सिन्हा यांनी सोडला आहे, असे सांगत तसेच, सिन्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांची विधाने सोशल मीडियावर नेमलेल्या पगारी प्रचारकांच्या फौजा सोडून खोडता येणार नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.