मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई: राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर नाराज असलेले काही शिवसैनिक आज मनसेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व शिवसैनिक आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील आहेत. आमदार म्हणून आदित्य ठाकरे वरळीत काहीच काम करत नसल्याने आपण मनसेत प्रवेश करत असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, सध्या शिवसैनिकांच्या या मनसे प्रवेशापेक्षा त्यांनी केलेल्या नियमाच्या उल्लंघनाचीच जास्त चर्चा रंगली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून जमावंबदीचे कलम लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास तसेच एका ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, सध्या मनसेप्रवेशासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी सर्वजण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दाटीवाटीने उभे आहेत. त्यामुळे आता कृष्णकुंजबाहेर जमलेल्या गर्दीवर पोलीस कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


मुंबईत जमावबंदीच्या आदेशानंतर आता पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात
 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यानंतर आता पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून संबंधित प्रवाशांना जमावबंदीच्या आदेशाबद्दल सांगितले जात आहे. तसेच मास्क परिधान करणे व इतर नियमांचे पालन करण्याबाबतही पोलीस प्रवाशांना बजावत आहेत.