मुंबई : नांदेड महापलिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार टोकलेय. मुखपत्र सामनातील संपादकीयमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडताना भाजपचा चौखूरलेला  वारु अशोक चव्हाण यांनी रोखलाय, असे नमूद केलेय.


पाहा काय म्हटलेय, अग्रलेखात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी लाटेच्या उदयापासून भाजप विजयाचा चौखूर उधळलेला वारू अशोक चव्हाणांनी रोखला. भाजपच्या घोडदौडीला लगाम घातला वगैरे वगैरे विश्लेषण नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाले आहे. आणखी दोन-चार दिवस त्यावर काथ्याकूट होत राहील. एक मात्र खरे की, निप्राण झालेल्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे काम नांदेड महापालिकेच्या निवडणुकीने केले आहे. 


संपूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या आमच्या मित्रपक्षासाठी मात्र नांदेडचा निकाल अधिक धक्कादायक आहे. भाजपचा पराभव होऊ शकतो, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने देशभर गेला आहे. पुन्हा हा पराभव साधासुधा नाही. दिल्ली विधानसभेत आम आदमी पार्टीने जशी भाजपला आपटी दिली होती तशीच ही धोबीपछाड आहे.


काँग्रेसचे प्रदेधाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एकूणच व्यूहरचना यशस्वी ठरली आणि नांदेडत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, हे आता मान्य करावेच लागेल ८१ सदस्य संख्या असलेल्या नांदेड माहाप्लिकेत तब्बल ७६ जागा जिंकून काँग्रेसने सर्वच राजकीय पक्षांना चकित केले. 


भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. सत्ता आणि पैशाचा वारेमाप वापर आणि आयाराम-गयारामांना मिठय़ा मारूनही जनतेने आपल्याला का झिडकारले, याचे चिंतन वगैरे यथावकाश होत राहील. मात्र फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होत नसते, हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा आहे. 


दरम्यान, शिवसेनेला या निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. हे अपयश म्हणा किंवा पराभव, त्याचा जो काय अभ्यास करायचा तो शिवसेना आपल्या पद्धतीने करेलच. मात्र एकाच वेळी अशोक चव्हाणांची काँग्रेस आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व नीती- अनीतींचा अवलंब करणाऱ्या भाजपशी आमच्या सामान्य शिवसैनिकांनी त्याच्या परीने दोन हात केले, संघर्ष केला हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो.