Ravindra Waikar Relief: शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. पण तेव्हा रवींद्र वायकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत होते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आली. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल गजानन किर्तिकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढली. अटीतटीच्या लढतीत खूप कमी फरकाने ही निवडणूक जिंकली. यानंतर काही दिवसातच खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाल्याने विरोधकांकडून टिकेची झोड उठवली जात आहे. 


जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय. 


रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. दरम्यान मुंबई मनपाकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


संजय राऊतांची टीका 


आता केवळ दाऊद इब्राहिमला क्लीन चीट द्यायची बाकी असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला. हे कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले. आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री पळून गेले, त्यांच्याबरोबर आमदार पळाले, अजित पवार पळून गेले. वायकरही त्यातलेच गेले. वायकरांना बाहेर पडायला भाग पाडल्याचे ते म्हणाले. आम्ही तुमच्या पक्षात येत नाही, तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर खटले असल्याचे राऊत म्हणाले. वायकरांवरील खटला मागे कसा घेतल्यावर आता सोमय्यांनी बोलावं. तुम्ही खरे असाल तर यावर बोलावं, असे ते म्हणाले.


रवींद्र वायकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायला हवा. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. एका आमदारावर एफआयर दाखल करता, ईडीकडे पाठवता आणि नंतर गुन्हे रद्द करता..वायकर स्वत:ला वाघ म्हणायचे..पण ते घाबरले..दबावात येऊन त्यांनी पक्ष बदलला. आमच्यावरदेखील दबाव होता पण आम्ही पक्ष सोडला नाही. आम्ही लढणार.. आमचे सरकार येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


कॉंग्रेसची टीका


वायकर उमेदवार झाले तेव्हाच उत्तर मिळाले. यात क्लिनचिटवर जास्त बोलायचे नाही. भ्रष्ट्र लोकांचे सरदार नरेंद्र मोदी आहेत अशी टीका कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केलीय. ही भाजपच्या वॉशिंगमशिनची कमाल आहे.. येथे भ्रष्टाचार धुवून स्वच्छ होऊन निघतो..भाजप भ्रष्टाचारी नेत्याला सोबत घेऊन स्वच्छ करतात, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.