मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधा बंद करून त्यांना विश्रामगृहातून बाहेर काढण्यात येत आहे. हा सुद्धा दडपशाहीचाच एक भाग आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, एसटी कर्मचारी संपाचा आज (बुधवार, १८ ऑक्टोबर) दुसरा दिवस असून, ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांशी पुन्हा एकदा चर्चा होते आहे. पहिल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं आता पुन्हा एकदा बैठक होणार आहे. मात्र, या बैठकीतूनही काही तोडगा निघेल अशी स्थिती दिसत नाही.


कामावर रुजू व्हा अन्यथा निलंबनाची कारवाई होईल असा इशारा परिवहन विभागानं आधीच दिलाय आहे. तसेच, कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरू करण्यात येईल असंही सरकारनं स्पष्ट केलंय. दरम्यान, सरकारने दिलेला इशारा धुडकाऊन लावत साताव्या वेतन आयोगाच्या मागणीवर एसटी कर्मचारी संघटना ठाम असून, संप सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे.


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातही संपाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे संप बेकायदेशीर ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पुढे काय होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.