नवी मुंबई : दिल्लीत गेलेल्या नारायण राणेंची सहा वर्षं हिंदी आणि इंग्रजी शिकण्यातच जातील, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावलाय. शिवसेनेला ज्यांनी अपशकून केला ते छगन भुजबळ तुरुंगात गेले, राणे महाराष्ट्रातून बाहेर गेले आणि गणेश नाईक घरी बसलेत... अशा शब्दांत देसाईंनी शिवसेना सोडलेल्या नेत्यांवर तोफ डागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यांची अवस्था बघितल्यावर कुणी शिवसेना संपवण्याची भाषा करणार नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनेनं 'एकला चलो रे' चा नारा दिला असून राज्यात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी तयारीला लागण्याचं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलंय. नवी मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी शत प्रतिशतचा नारा देणाऱ्यांना आता मित्रपक्षाची आठवण झाल्याचा टोलाही देसाईंनी लगावला.


काल मुंबईत झालेल्या भाजपाच्या जाहीर सभेत अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला चुचकारलं होतं. हाच धागा पकडून आता भाजपाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचा टोमणा उद्योगमंत्र्यांनी मारलाय.