मुंबई : होय! माझं एक वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यामधील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केला. निवडणूक झाल्यावर दिल्लीत मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेन तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू, असं वक्तव्य केलं. यामुळेच त्या दोघांमधली दरी वाढली आणि शिवसेना आमच्यासोबत आली असं ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली. यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. शरद पवार यांनीच अजित पवारांना (Ajit Pawar) फडणवीसांकडे पाठवल्याचं अजूनही बोललं जातं.


यावर बोलताना पवार म्हणाले की, मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. त्यामुळे या आरोपांना काही अर्थ नाही.


आघाडी म्हणून सेना-भाजपाकडे (shivsena-bjp Allince) बहुमत होतं. मात्र, सेना आणि भाजपा एकत्र राहणार नाही हे दिसलं. ते दोघे एकत्र आले असते तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. माझ्या त्या वक्तव्यामुळे सेनेत अस्वस्थता पसरली. त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली, असे ते म्हणाले.


पंतप्रधानांसोबत झाली होती चर्चा
महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याशी चर्चा झाली होती. तशी मोदींची इच्छा होती. मात्र हे शक्य नाही असे त्यांना सांगितले होते. यावर त्यांनी अजूनही विचार करा असं सांगितले होते असंही पवार म्हणाले.