मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे काम करण्यास आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने राज्य शासनाचा डाव फसलाय. त्यामुळे ११ व्या दिवशी संप सुरुच आहे. हा संप आता चिघळणार असल्याचे स्पष्ट झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ सप्टेंबरपासून अंगणवाडी-सेविका मदतनीसांनी मानधनवाढीसाठी पुकारलाय संप पुकारला आहे. हा संप ११ व्या दिवशी सुरुच आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप मोडण्याचा सरकारचा प्रयत्न फसला आहे. अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे काम करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकार दिल्याने सरकारच्या अडचणी वाढल्यात.


सरकारने आशा कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आशा कर्मचाऱ्यांचा नकार दिलाय. सरकारने जबरदस्ती केली तर संपावर जाण्याचा आशा कर्मचाऱ्यांचा इशारा दिलाय. त्यामुळे सरकार आता अडचणीत आले आहे.  संप मोडण्यासाठी आशा कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे मानधन देऊन काम करण्यास सरकारने सूचना केल्या होत्या.


महाराष्ट्रातील २ लाखाहून जास्त अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे आपल्या मानधनवाढ, नियमित मानधन तसेच चांगल्या दर्जाच्या, ताज्या शिजविलेल्या पूरक पोषक आहाराचा पुरवठा या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने लढत आहेत. गेल्या वर्षभरात तेलंगणा, केरळ, दिल्ली या राज्यांमध्ये मानधन १० हजारांवर तर कर्नाटक, हरियाणा, आंध्र प्रदेश, तमिलनाडू अशा अनेक राज्यांमध्ये ८ हजारांवर गेले आहे. 


महाराष्ट्रात मात्र अजूनही सेविकांना ५००० तर मदतनिसांना २५०० इतक्या तुटपुंज्या मानधनावर राबवून घेतले जात आहे. सर्व प्रयत्न करून झाल्यावर शेवटी या २ लाख अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेळकाढू धोरणामुळेच ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्यास भाग पाडले गेले असून हा संप शासनाच्या हटवादी भूमिकेमुळे अजूनही सुरु आहे, असे संघटनेने म्हटलेय.