मुंबई : काँग्रेसने (Congress) पुन्हा एकदा स्वबळाची भाषा केली आहे. आधीचा नाना पटोले ( Nana Patole) यांच्या वक्तव्यानंतर महाआघाडीत नाराजी व्यक्त होत असताना पुन्हा एकदा स्वबळावर लढायचे हा काँग्रेस पक्षाचा अजेंडा असल्याचे नाना पटोले यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. 2024मध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनविण्यात येईल, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले यांच्याकडून पुन्हा स्वबळाची भाषा झाल्याने आधीच्या वादात आणखी भर पडली आहे. त्याचवेळी स्वबळावर लढायचं असेल तर स्पष्ट सांगा, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सवाल विचारला आहे. तर काँग्रेसला नवसंजीवनीची गरज असल्याचा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वबळावर लढायचे हा काँग्रेस पक्षाचा अजेंडा असल्याचे नाना पटोले यांनी पुन्हा एकदा म्हटले. '2014 मध्ये काय झाले हे पवार साहेबांना माहीत असून आमच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचा हे आमचा पक्ष बघेल, असेही पटोले म्हणालेत. इतकंच नाही तर 2024 मध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष असेल अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी उद्भवलेल्या वादानंतर दिली आहे.



त्याचवेळी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी राष्ट्रवादीने भूमिका मांडली आहे. एकटं लढायचं ठरवले असल्यास स्पष्ट सांगा, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना थेट सवाल केला आहे. काल काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती होती. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी पवारांची भेट घेत भूमिका स्पष्ट करत पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.



नाना पटोले यांच्या वक्तव्यावर पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली. काल शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक झाली. यावेळी पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी काल शरद पवारांची भेट घेतली होती.