Chitra Wagh vs Urfi Javed : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्या वादात उडी घेतलीय. उर्फी जावेदच्या अतरंगी वेशभूषेवर आक्षेप घेणाऱ्यांनी कंगना राणावत (Kangana Ranaut), केतकी चितळे (Ketaki Chitale) यांच्या वेशभूषेवर (Costumes) आक्षेप घेऊ शकाल का असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. उर्फीच्या वेशभूषेवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. उर्फीवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर उर्फीनं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं, यावर उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार असा इशारा दिला. त्यावरून आता सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या (FaceBook Post) माध्यमातून चित्रा वाघ यांना सवाल विचारलेयत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्ट चर्चेत
सुषमा अंधारे यांनी काल आपल्या फेसबूक पेजवर एक पोस्ट करत सवाल उपस्थित केला होता. या पोस्टसोबत त्यांनी केतकी चितळे, कंगना रनौत यांचे बिकनीतले फोटोही पोस्ट केले आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 'मी साडी नेसते.  मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. 


पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो.  कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच... अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ?  
 
उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? 
आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का? नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल, असं सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, यासोबत त्यांनी #सत्तेचा_माज #arrogance हे हॅशटॅग जोडले आहेत. 



चित्रा वाघ यांचं उत्तर
सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावाला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? असं म्हणत चित्रा वाघ यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.


स्वैराचाराला अटकाव घालणं, हा ही धर्म नाही का ?


व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का ?


लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का ?


स्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का ?


जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का ?


माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या, छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या ... खऱ्या अर्थानं, महिला सक्षमीकरणाचा जागर करू या ... हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे, ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का ? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.