प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : वसईमध्ये एका आठ वर्षीय मुलीचा शेजारीच राहणाऱ्या शाळकरी मुलाने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीने चिडवल्याने अल्पवयीन मुलाने तिचा गळा आवळून खून केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुलाच्या बापानेही यामध्ये त्याला साथ दिली होती. तब्बल सात दिवसांनी मुलीच्या हत्येची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याप्रकरणी बापाना पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई मध्ये चांदणी साह या आठ वर्षीय शाळकरी मुलीच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे.  1 डिसेंबर पासून चांदणी बेपत्ता होती. सोमवारी तिचा मृतदेह  शेजारच्या बंद घरात आढळून आला होता. त्यानंतर अधिक तपासानंतर शेजारी राहणाऱ्या 15 वर्षीय मुलानेची तिची हत्या केल्याचे उघड झालं आहे. याप्रकरणी मुलाचे वडील रामेश्वर कराळे यांना पेल्हार पोलिसांनी अटक केली आहे. तर मुलाला गुन्हे शाखा 2 च्या पथकाने जालना येथून अटक केली आहे. 


चांदणीच्या हत्येनंतर आरोपी मुलगा पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्या वडिलांकडे केलेल्या चौकशीत आरोपी मुलाच्या वडिलांनी हत्याची कबुली दिली. महत्त्वाचे म्हणजे आरोपी मुलाच्या वडिलांना या हत्येबाबत माहिती असूनही ती लपवली होती.. मुलाने गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांनीच तिचा मृतदेह बाजूच्या बंद घरात टाकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 


दरम्यान, चांदणी आरोपी मुलाला शेंबडा म्हणून चिडवत होती. या चिडवण्याच्या रागातून पंधरा वर्षीय मुलाने तिची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने चांदणीला घरात नेऊन गळा दाबून तिची हत्या केली. दोन दिवस चांदनीचा मृतदेह घरातच एका गोणीत लपवून ठेवला होता. त्यानंतर रामेश्वर कराळेने ती गोणी एका मोकळ्या खोलीत आणून टाकली. तपास सुरु असताना पोलिसांना आरोपीच्या घराबाहेर चांदनीची चप्पल सापडली होती. त्यावरून पोलिसांनी मुलाचे वडील रामेश्वर कराळे याला अटक केली. अटकेनंतर मुलाने हे सर्व कृत्य केल्याची कबुली रामेश्वर कराळेनी दिली.