सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा स्वरूपात आता थेट लढत होत असतानाच महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरघोडींचा फायदा जर भाजपाने घेतला, तर महाराष्ट्रामध्ये पुढील काही महिन्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे सहा उमेदवार असून भाजपाचे पाच आहेत एकूण जागा दहा असून उमेदवार अकरा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत जर भाजपाचे पाच विधान परिषदेचे उमेदवार जिंकले आणि विधान परिषदेत एकूण 145 मतदान पेक्षा अधिक मत कमवली तर मात्र महाविकासआघाडी अल्पमतात आहे, असा संकेत जाणार आहे. यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढेल.


जर महा विकास आघाडीने मतांचा कोटा भलेही मागेपुढे झाला तरी, सर्व उमेदवार जिंकून आले आणि भाजपाचा पाचवा उमेदवार पडला तर मात्र महाविकास आघाडी कितीही संकटात असली तरी एकोपा असल्याचा संकेत जाणार आहे. यामुळे विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीसाठी फार महत्त्वाची असणार आहे.


राज्यसभा निवडणुकीत भाजपाची क्षमता 113 असताना देखील भाजपाने 123 मदत घेतली. दहा मत खुल्या पद्धतीने मतदान असताना भाजपाने घेतल्याने महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे मतदान ही गोपनीय पद्धतीने आहे.


यामुळे कोणत्या पक्षाचे आमदार कोणाला मतदान करतात याचीच कल्पना नसल्यामुळे प्रत्येक पक्ष एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहे.  अशात मतदानामध्ये भाजपाने बहुमतासाठी असणाऱ्या 145 मॅजिक फिगर मिळवली तर मात्र महाविकासआघाडी अल्पमतात आहे असा अप्रत्यक्षरीत्या संदेश जाईल. 


असं घडल्यास पुढच्या कालावधीमध्ये अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे असा संकेत देण्याची वेळ महा विकास आघाडीच्या नेत्यांवर आलेली आहे. 


महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद एकमेकांविषयी असणाऱ्या संशयाच्या वातावरणचा फायदा भाजपाने घेतला तर मात्र महाविकास आघाडीसाठी पुढचा काळ अतिशय कठीण असणारा हे विधान परिषदेच्या निकालानंतर कळेल.


महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार का याचं उत्तर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.