मुंबई : देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय माल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयानं अजून एक दणका दिलाय. सक्तवसुली संचालनालयानं विजय माल्ल्याला आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी फरारी घोषित करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. या विनंतीवर स्थगिती आणण्याची मल्ल्याची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता विजय माल्ल्याला फरारी घोषित करण्याचा आणि त्याच्या संपत्तीवर टाच मार्ग मोकळा झालाय. कायद्याप्रमाणे एकदा गुन्हेगार फरारी घोषित झाला की कारवाई करणा-या यंत्रणेला त्याची संपत्ती जप्त करण्याचे पुर्ण अधिकार असतात. फरारी घोषित करण्यावर स्थगिती आणावी ही मागणी विशेष न्यायालयानं फेटाळून लावल्यावर मल्ल्यानं उच्च न्या्यालयात धाव घेतली होती पण उच्च न्यायालयानेही स्थगिती देण्यास नकार दिला. 


भारतातील बँकांचे हजारो कोटी रूपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्याला ईडीने दणका दिला होता. ईडीने माल्ल्याचे अलिबागमधलं सुमारे १०० कोटी रूपयांचे फार्म हाऊस ताब्यात घेतले. मांडवा इथल्या समुद्र किनाऱ्यालगत माल्ल्याचे सतरा एकरमध्ये आलिशान फार्महाऊस आहे.


ईडीच्या मुंबईतील पथकाने माल्ल्याचे अलिशान फार्म हाऊस धाड टाकत ते जप्त केले. या मालमत्तेची किंमत ईडीने २५ कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बाजारभावानुसार याची किंमत सुमारे १०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.