मुंबई : १०० मिमी पाऊस झाला आणि मुंबई पुन्हा विस्कळीत झाली. जगातली एक महानगरी मुंबई... पण १०० मिमी पावसाने मुंबईची अव्यवस्था पुन्हा जगासमोर आली. गेल्या २४ तासांत मुंबईत १०० मिमी पाऊस झाला आणि मुंबापुरीची तुंबापुरी झाली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस झाला आणि जनजीवन विस्कळीत झालं. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागाला पावसाने झोडपून काढलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत सुरु असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली. हिंदमाता भागात तर कंबरभर पाणी होतं.  


पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहतूक संथगतीने सुरू होती. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेनं मान टाकली. दुपारपासून वाहतूक संपूर्णपणे बंद होती. 


राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या ८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.


मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक दयनीय अवस्था होती रेल्वे प्रवाशांची. हवामान खात्याने गणपती उत्सवात रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचा इशारा ५ दिवसांपूर्वीच दिला होता. मात्र मनपा प्रशासन, रेल्वे प्रशासन, राज्य सरकार कोणत्याही स्वरूपात तयार असल्याचं दिसलं नाही. ट्रॅकवर पाणी भरायला लागल्यावर मध्य रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी, पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते चर्चगेट आणि वसई ते विरार दरम्यान वाहतूक बंद होती. तर हार्बर मार्गावर वाशी ते सीएसएमटी वाहतूक पूर्ण ठप्प होती. 


रस्ते वाहतुकीचेही तीन तेरा वाजले होते. सायन, किंग्ज सर्कल, ऐरोली, भागात प्रचंड पाणी साठलं. त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. एकूणच जागतिक दर्जाच्या मुंबईची अवघ्या १०० मिमी पावसाने दयनीय अवस्था करून टाकली. सुस्त प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भरडला गेला तो मुंबईकर...